
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी झालेल्या जनआंदोलनात शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारसह भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांचाही समाचार घेतल्यानंतर मुदखेड येथे रात्री झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलताना खा.चव्हाण यांनी राऊत यांना प्रत्युत्तर देतानाच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निवाडा जाहीर करून टाकला.
ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रलंबित बाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दुपारी मोठे आंदोलन करण्यात आले.
त्यात सहभागी होण्यासाठी आलेले खा.राऊत तसेच आ.अंबादास दानवे यांनी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचाही समाचार घेतला होता. मराठवाड्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट असताना दुष्काळ जाहीर करण्याची मागणी घेऊन खा.चव्हाण आपल्या नेत्यांकडे का गेले नाहीत, असा सवाल या आंदोलनात करण्यात आला. खा.चव्हाण शुक्रवारी नांदेडमध्येच होते; पण शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेल्या टिकेला त्यांनी आपल्या मतदारसंघातील मुदखेड येथे उत्तर दिले. नांदेडला येऊन गेलेले नेते केवळ निवडणुकीपुरते येणारे आहेत.निवडणुका संपल्यानंतर तुमच्याकडे अशोक चव्हाण आणि आ.श्रीजया चव्हाणच येतील, असे स्पष्ट करून चव्हाण यांनी ठाकरे गटाचे नेते यापूर्वी कधी नांदेडला आले होते का, या भागातील जनतेची दुःख त्यांनी जाणून घेतली का, या भागामध्ये चाललेली कामे त्यांनी पाहिलीत का, असा सवाल केला.
दहीहंडी निमित्त मोठ्या संख्येने जमलेल्या जनसमुदायासमोर बोलताना खा.चव्हाण यांनी महाराष्ट्रात नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा जशी देवाभाऊंची आहे, तशी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्वाळा दिला.
जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन काही तरी बोलायचे, त्यानंतर बातम्यांमध्ये झळकायचे, असा कार्यक्रम विरोधकांकडून सुरू आहे. त्यांची ही शेवटची तडफड असल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावला. चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास आ.अमरनाथ राजूरकर, उद्योजक मारोतराव कवळे, नगगराध्यक्षा विश्रांती कदम यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



