Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यानवगण विश्लेषणराष्ट्रीय

मोदींनी हैदराबदाच्या सभेत केलेल्या आवाहनामुळे देशभर खळबळ, सोशल मीडियात चर्चेला उधाण…

हैदराबाद : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे तसेच मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया – युक्रेन लढाईमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत.

या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना बचतीचे आवाहन केले आहे. “देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी पुढील वर्षभर घरात कोणतेही कार्यक्रम असले तरी सोने खरेदी करू नका,” अशी कळकळीची विनंती पंतप्रधानांनी केली आहे.

तेलंगणा येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी देशाच्या आर्थिक सुरक्षेवर भाष्य केले. “पूर्वी जेव्हा देशावर संकट यायचे, तेव्हा लोक आपले सोने दान करायचे. आज मी तुम्हाला दान मागत नाही, पण देशहितासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केले.

पंतप्रधानांनी यावेळी भारताच्या आयातीवर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. “भारताकडे इंधनाच्या मोठ्या विहिरी नाहीत. आपल्याला पेट्रोल आणि डिझेलसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा स्थितीत देशाला इंधन आणि खतांची आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची गरज लागते. सोने खरेदी कमी केल्यास हे चलन वाचवता येईल आणि त्याचा उपयोग देशाच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी होईल,” असे मोदींनी सांगितले.

जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, “जगात खतांच्या एका गोणीची किंमत सुमारे ३ हजार रुपये असताना, केंद्र सरकार भारतीय शेतकऱ्यांना ती केवळ ३०० रुपयांत उपलब्ध करून देत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वाढत्या महागाईचे सर्व ओझे सरकार आपल्या खांद्यावर उचलत आहे, जेणेकरून सामान्य जनतेला त्रास होऊ नये. मात्र, पुरवठा साखळीवर दबाव वाढल्यास अडचणी वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनीही आपला सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.”

दैनंदिन जीवनात बदलाचे आवाहन : पंतप्रधानांनी इंधनाचा संयमाने वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले. खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल आदी सर्व प्रकारच्या तेलांचा जपून वापर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले. अनावश्यक प्रवास टाळा, डिजिटल कामाला प्राधान्य द्या. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करा; असेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना केले आहे.

‘देशासाठी जगणे हीच खरी देशभक्ती’ : भाषणाचा शेवट करताना पंतप्रधानांनी देशभक्तीची नवी व्याख्या मांडली. ते म्हणाले, “देशासाठी केवळ प्राण देणे हीच देशभक्ती नसते, तर देशासाठी जगणे आणि आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे, ही सुद्धा मोठी देशभक्ती आहे. सद्यस्थितीत एकजूट होऊन या आर्थिक आव्हानांचा सामना करणे हीच काळाची गरज आहे.” या आवाहनामुळे आता देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, लग्नसराईच्या काळात सुवर्ण बाजारावर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *