डॉक्टर पतीचा काळा कारणामा;घरात CCTV लावून पाळत, शेजाऱ्यांशी बोलल्यास मारहाण; लग्नानंतर अवघ्या ४५ दिवसांतच पत्नीची आत्महत्या…

अंबरनाथमध्ये एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मृत विवाहितेच्या डॉक्टर पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
विशाखा टिळेकर असे या २६ वर्षीय मृत नवविवाहितेचे नाव आहे. अंबरनाथमधील डॉ. नितीन टिळेकर याच्यासोबत ३० एप्रिल २०२६ रोजी तिचा विवाह झाला होता. लग्नापूर्वी सर्व काही सुरळीत होते, मात्र लग्नानंतर विशाखाचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. लग्नात अपेक्षेप्रमाणे मानपान मिळाला नाही, तसेच माहेरून पैसे आणि दागिने आणले नाहीत, या कारणावरून तिला सतत त्रास दिला जात होता.
पत्नीवर देखरेख ठेवण्यासाठी घरात बसवले होते सीसीटीव्ही
पत्नी दिवसभर काय करते, कोणाशी बोलते आणि कुठे जाते यावर लक्ष ठेवण्यासाठी पती डॉ. नितीन टिळेकर याने घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. विशाखाला तिच्या माहेरच्यांशी बोलण्यासही बंदी घालण्यात आली होती. तसेच शेजाऱ्यांशी बोलल्यास तिला मारहाण केली जात असे. दोन दिवसांपूर्वी शेजारच्या एका महिलेशी बोलल्याच्या कारणावरून विशाखाला पतीने बेदम मारहाण केली होती, असा आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी विशाखाने आपल्यावर होत असलेल्या त्रासाची माहिती आईला फोनवरून दिली होती. यानंतर तिचे आई-वडील तिला माहेरी घेऊन येण्याची तयारी करत होते; मात्र त्यापूर्वीच विशाखाने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंड्यासाठी छळ करणे यासह विविध कलमांनुसार पती डॉ. नितीन टिळेकर याच्यासह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी पती नितीन टिळेकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.



