दिवसाला २८०० कोटींचं तेल समुद्रात जातंय वाहून, इराणच्या ‘या’ कृतीने जग हादरलं! धक्कादायक कारण…

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता केवळ लष्करी राहिलेला नाही. अमेरिकेने लादलेल्या युद्धामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी वर्तवण्यात येत होती. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्यानंतर जगातील अनेक देशात इंधन पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
युद्धाची धग कमी झाल्यानंतर अमेरिकेने इराणची कोंडी करत होर्मुझची नाकेबंदी केली. अमेरिका-इराणच्या या संघर्षामुळे आता नवा पेच निर्माण झाला आहे.
अमेरिकेने केलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे इराणचे कच्चे तेल जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकत नाही. परिणामी, साठवणुकीची सर्व यंत्रणा पूर्ण भरल्यामुळे इराणला दररोज सुमारे ३० लाख बॅरल कच्चे तेल समुद्रात वाहून द्यावे लागत आहे. या तेलाची किंमत दिवसाला तब्बल २,८०० कोटी रुपये इतकी आहे.
होर्मुजची नाकेबंदी आणि जहाजांची कोंडी
गेल्या एका महिन्यात इराणचे ५८ ऑईल टँकर होर्मुजची सामुद्रधनी पार करू शकलेले नाहीत. इराणची ३ कोटी बॅरल तेल साठवण्याची क्षमता आता पूर्णपणे संपली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, २८ एप्रिल रोजी इराणने आपल्या ‘नाशा’ नावाच्या ३० वर्षे जुन्या जहाजात २० लाख बॅरल तेल साठवले होते. मात्र, आता जहाजांची कमतरता आणि साठवणुकीचे सर्व पर्याय संपल्याने इराणसमोर तेल नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
तेल विहिरी बंद का करता येत नाहीत?
इराण तेलाचे उत्पादन का थांबवत नाही? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र, याचे कारण तांत्रिक आहे. इराणकडे सुमारे ३,५०० सक्रिय तेल विहिरी आहेत. या विहिरींमधून सातत्याने तेल काढणे आवश्यक असते. जर या विहिरींमधून तेल काढणे बंद केले, तर त्यात पाणी भरण्याची शक्यता असते. एकदा का विहिरीत पाणी शिरले की त्या कायमच्या निकामी होतात. या तांत्रिक अडचणीमुळे इराणला तेल काढणे सुरूच ठेवावे लागत आहे, परंतु विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने हे मौल्यवान तेल समुद्रात वाहून जात आहे. या प्रकारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसह पर्यावरणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



