टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द

कर्जत: कर्जत तालुक्यात येऊ घातलेल्या टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्ट चे सायडोंगर येथे जाण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या रस्त्याची मोजणी दुसऱ्यांदा स्थानिक शेतकऱ्यांनी हाणून पाडली.
काही दिवसांपूर्वी आंबोट गावातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जमिनीची मोजणी न करता परतवून लावले होते, त्यानंतर आज भालिवडी गावातील ग्रामस्थांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जमिनीची मोजणी करून दिली नाही. (Torrent Hydraulic Power Project)
हायड्रॉलिक प्रकल्प उभारण्याच्या हालचाली
टोरंट एनर्जी सोल्युशन पॉवर प्रोजेक्ट कंपनी कडून कर्जत तालुक्यातील सायडोंगर येथे हायड्रॉलिक प्रकल्प उभारण्याच्या हालचाली करीत आहे.केंद्रीय आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ स्तरावरून या प्रकल्पाला हिरवा कंदील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारचे रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने सायडोंगर ते भालीवडी असा 5.900 किलो मीटर लांबीचा रस्ता बनवण्यासाठी अधिसूचना काढली आहे.
या रस्त्यासाठी भालिवडी पासून आंबोट,पाली,पोटल आणि सायडोंगर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी ही अधिसूचना काढली गेली आहे. त्याचवेळी हुमगाव येथून सायडोंगर असा आणखी एक रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. भालिवडी पासून सायडोंगर असा रस्ता बनवण्यासाठी कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यसरकारचे आहेत. त्यानुसार बांधकाम खात्याचे अप अभियंता राहुल देवांग यांच्याकडून रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मोजणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जमीन मोजणी करण्यास विरोध
मात्र या हायड्रॉलिक प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे.काही दिवसापूर्वी आंबोट गावातील जमिनीमधून संभाव्य रस्ता नेण्याचे टोरंट कंपनी कडून ठरवले आहे,त्या जागेची मोजणी करण्यासाठी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पोहचले होते.त्यावेळी ग्रामस्थांनी एकजूट दाखवत आपली जमीन मोजणी करण्यास विरोध केला होता आणि त्यामुळे बांधकाम खात्याला जमिनीची मोजणी करता आली नव्हती. त्यानंतर आज भालिवडी येथे बांधकाम खात्याचे उप अभियंता राहुल देवांग आणि शाखा अभियंता पोहचले. यावेळी काही मिनिटात भालिवडी गावातील ग्रामस्थ येथे पोहचले.
मयुर पाटील यांनी आमच्या जमिनीत तुम्ही आलेच कसे?असा प्रश्न विचारत आमच्या जमिनीतून तुम्ही निघून जावे अशी रोखठोक भूमिका घेतली.त्यावेळी अनेक शेतकरी पुढे आले आणि त्यांनी जमिनीची मोजणी करू दिली नाही.शेवटी भालिवडी पासून सुरू होणाऱ्या टोरंट कंपनीच्या रस्त्याला सुरुवात होत असलेल्या भागात स्थानिकांचा विरोध झाल्याने रस्ता करण्यासाठी जमीन मिळणार काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.



