दुष्काळाच्या व्हायरल यादीमागे सत्य काय?; कृषिमंत्र्यांनी दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण आदेश, दुष्काळ यादीसंदर्भात धक्कादायक प्रकार, वाढवली डोकेदुखी, नेमकं घडलं काय?

अकोला : राज्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या सर्व गंभीर परिस्थितीत जिल्हा व तालुकानिहाय दुष्काळ यादी समाज माध्यमातून प्रसारित झाली.
काही जिल्हे व तालुके वगळल्याचा आरोप करून त्याला विरोध झाला. मात्र, ही यादीच बनावट व खोटी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कथित यादीने राज्य सरकार व प्रशासनाची डोकेदुखी वाढवली. याची गंभीर दखल राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली. हा खोडसाळपणा करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. कुठलीही यादी प्रकाशित झाली नसून ती यादी फेक आहे. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सोयाबीनची पिके वाळली
यंदा राज्यात ‘एल-निनो’चा मोठा फटका बसला आहे. गेल्या सुमारे दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यामध्ये घट होत आहे. पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था दयनीय झाली. पावसाअभावी सोयाबीनची पिके वाळून गेली आहेत. शेंगा भरण्याच्या निर्णायक टप्प्यातच पिकांनी माना टाकल्याचे चित्र आहे. डोळ्यांसमोर उभे पीक करपताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् संताप दिसून येतो.
कृषिमंत्र्यांकडे शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
अनियमित व पावसाचा प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामातील हातचे पीक गेले. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी आता रब्बी हंगामावर प्रश्नचिन्ह लागले. आर्थिक विवंचेत बळीराजा सापडला आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अकोला, वाशीम जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कृषिमंत्र्यांकडे शेतकऱ्यांनी आपल्या व्यस्था मांडल्या आहेत.



