
बीड, 12 सप्टेंबर । दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा अक्षरशः धुराळा झाला आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले.
प्रमुख मागण्या
– नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
– मागील अतिवृष्टीच्या घोषणेनुसार हेक्टरी १७ हजार रुपये पीकविमा द्यावा.
– २०२० सालचा थकीत पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा.
– बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून दुष्काळ जाहीर करावा.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील गावागावांत शेतकरी बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांची माहिती देतानाच आगामी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.



