Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

तुरूंगातून बाहेर येताच संतोष पंडित यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “सत्ताधाऱ्यांना…”

पुण्यातील यूट्यूबर संतोष पंडित यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली आहे. न्यायालयाने 16 सप्टेंबर रोजी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.

त्यानंतर 17 सप्टेंबरला त्यांना कारागृहातून बाहेर सोडण्यात आले. न्यायालयाने जामीन देताना काही महत्त्वाच्या अटीही घातल्या आहेत.

संतोष पंडित यांनी या प्रकरणातील फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्क करू नये, तसेच प्रकरणाशी संबंधित कोणत्याही पुराव्यात छेडछाड करू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर संतोष पंडित यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. या संपूर्ण प्रकारामुळे आपल्याला मोठा धक्का बसला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं पंडित यांनी म्हटलं.

आपण करत असलेले काम हे संविधानाने दिलेल्या अधिकारांतर्गत असल्याचे संतोष पंडित यांनी सांगितले. यापूर्वीही आपण हा अधिकार बजावत होतो आणि भविष्यातही तो बजावत राहणार. मी थांबणार नाही. लोकशाहीमध्ये जनता ही देशाची मालक आहे. जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि सत्तेत असलेल्या व्यक्तींना जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे आवश्यक असल्याची भूमिका संतोष पंडित यांनी मांडली.

नेमकं प्रकरण काय?

संतोष पंडित हे पुणे महापालिकेच्या विकासकामांशी संबंधित मुद्दे सोशल मीडियावर मांडत असतात. शहरातील विकासकामांमध्ये असलेल्या त्रुटींवरही ते व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य करतात. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

यामध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलसांनी पंडित यांना मध्यरात्री अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *