
राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
तर विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात सकाळपर्यंतच्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली. मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान असल्याने राज्यात गेल्या सहा दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे.
घाट माथ्यावर अतिजोरदार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पावसानं राज्यात कहर केल्यामुळे शाळांना अनेक जिल्ह्यांमध्ये सुट्टी देण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या शाळांना ३ दिवस सुटी देण्यात आली आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा Danger warning निर्णय घेण्यात आलाय. १७ तारखेपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. तर संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्हा, वसई विरार, नवी मुंबई, नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यातही शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.