Navgan News

ताज्या बातम्यासंपादकीय

देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन ! इतिहास आणि महत्व


जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष होत आहेत. देशभरात यंदा ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.२६ जानेवारी २०२२ रोजी ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. देशाची राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमंलात आली, म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो.प्रजासत्ताक दिनानिमित्त, शाळा आणि महाविद्यालये वादविवाद, भाषण, निबंध अशा अनेक स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करतात. देशातील प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावात ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो.

इतिहास

भारताला ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर आधारित होते. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापना केली गेली. बरेचसे विचार-विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती हिंदी आणि इंग्रजी २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसांनंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने २६ जानेवारीला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ हा साजरा करण्यात येऊ लागला.

महत्त्व

देशभरात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असं मानलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारलं. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *