शेतकऱ्याकडून कृषिमंत्री दत्ता भरणेंना काजू-बदाम देऊन निषेध! दुष्काळ आढावा बैठकीतील प्रकारावरुन मुख्यमंत्र्यांचीही नाराजी

राज्यात एकीकडे बळीराजा भीषण दुष्काळाच्या झळा सहन करत असताना, दुसरीकडे शासकीय बैठकीत मात्र व्हीआयपी पाहुण्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी सजल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ आढावा बैठकीत मंत्री, खासदार आणि आमदारांना ड्रायफ्रूट्सच्या थाळ्या ठेवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, एका संतप्त शेतकऱ्याने तर थेट कृषिमंत्र्यांनाच काजू-बदाम भेट देऊन सरकारचा अनोखा निषेध नोंदवला. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासनाचे कान उपटले असून, “दुष्काळासारख्या संवेदनशील विषयाच्या बैठकीत अशा गोष्टी टाळायला हव्या होत्या,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील दुष्काळ आणि टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री मेघना बोर्डिकर, नांदेडचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, जालना खासदार कल्याण काळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आणि अधिकारी उपस्थित होते. भाजप खासदार अशोक चव्हाण हेदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीत दुष्काळावर गंभीर चर्चा सुरू असतानाच टेबलवर उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी काजू, बदाम आणि सुकामेव्याने भरलेल्या बऱ्याच प्लेट्स ठेवण्यात आल्या होत्या. या दृश्याचा व्हिडिओ बाहेर येताच सर्वसामान्यांमधून आणि शेतकरी संघटनांमधून तीव्र संताप व्यक्त केला गेला. वाद वाढताना दिसताच प्रशासनाने तातडीने बैठकीच्या टेबलवरून या प्लेट्स हटवल्या.
शेतकऱ्याने पानभर काजू-बदाम देऊन कृषिमंत्र्यांना घेरले
नांदेडची बैठक आटोपून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हिंगोली दौऱ्यावर पोहोचले असता, तिथे एका स्थानिक शेतकऱ्याने त्यांचा ताफा अडवला. त्या शेतकऱ्याने एका झाडाच्या पानावर काजू आणि बदाम ठेवून ते थेट कृषिमंत्र्यांसमोर धरले. “साहेब, शेतकरी दुष्काळाने मरतोय आणि तुम्ही बैठकांमध्ये काजू-बदाम खाताय, हे घ्या तुम्हीच खा,” अशा शब्दांत या शेतकऱ्याने आपले दुःख आणि राग व्यक्त केला.
कृषिमंत्र्यांनी मात्र ते स्वीकारण्यास नकार दिला आणि “राज्य सरकार दुष्काळाबाबत पूर्णपणे गंभीर असून शेतकऱ्यांना सर्व ती मदत केली जाईल,” असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली.
“प्रशासनाने संवेदनशीलता बाळगावी” – मुख्यमंत्री फडणवीस
या वादावर नागपूर येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
“सामान्यतः प्रशासकीय बैठकांमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवण्याची एक पद्धत असते. परंतु, दुष्काळासारख्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेताना प्रशासनाने अशा गोष्टी टाळायला हव्या होत्या. दुष्काळ आहे म्हणून कोणी जाणूनबुजून हे करत आहे, असा दावा करणे चुकीचे ठरेल; पण प्रशासनाने विषयाचे गांभीर्य ओळखून नक्कीच संवेदनशीलता दाखवायला हवी,” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रशासनावर हल्लाबोल
- संजय शिरसाट (सामाजिक न्याय मंत्री):
“नांदेडच्या प्रशासनाला अजिबात अक्कल किंवा भान उरलेले नाही का? आपण कोणत्या विषयावर चर्चा करत आहोत आणि तिथे कसे वागले पाहिजे, याचे साधे ज्ञान अधिकाऱ्यांना असायला हवे. अधिकारी अशा चुका करतात आणि त्याचा नाहक मनस्ताप आम्हाला सहन करावा लागतो.” - रोहित पवार (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष):
“राज्यभरात बळीराजा दुष्काळाने होरपळतोय आणि सरकार मात्र बैठकांमध्ये काजू-बदाम खाण्यात मस्त आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. सरकारने तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळावर सविस्तर चर्चा करावी आणि शेतकऱ्यांना थेट मदत जाहीर करावी. पावसाळ्याच्या दिवसांत सरकारने दुष्काळ सर्वेक्षणाची कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
राज्यभरात सध्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, दुष्काळात होणाऱ्या या ‘व्हीआयपी संस्कृती’वर सर्वसामान्यांमधून कडाडून टीका होत आहे.



