मोठी बातमी! नियम-निकष बाजूला सारून भरीव मदत करू, शेतकर्यांशी रात्री उशीरापर्यंत संवाद, दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना अनेक ठिकाणी शेतात जाऊन पावसाअभावी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र कारंजा तालुक्यातील खेरडा इथं पोहचण्यास त्यांना उशीर झाला.
तरीही त्यांनी नियोजित दौरा अर्ध्यावर नं सोडता रात्री उशिरा शेतकर्यांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि शेतकर्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पावसाअभावी वाशिम जिल्ह्यात पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून खरीप हंगाम हातचा गेला आहे. 6 ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करू. नियम निकष बाजूला ठेवत शेतकर्यांना भरीव मदत जाहीर करू. या संकटात सरकार शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे असा विश्वास भरणे यांनी शेतकर्यांना दिला.
शेतकऱ्यांच्या बांधावर जात साधला संवाद
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे वाशिमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले. जिल्ह्यात पावसाच्या खंडाने खरीप पिके संकटात आहेत. पाच तालुक्यांतील पिकांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मालेगाव तालुक्यातील झोडगा येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. या दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. पुढे सुपखेला, वरुड बुद्रुक, कुपटा, खेरडा गावांमध्येही पाहणी केली. सोयाबीन, तूर, कपाशीच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. रात्री उशीरापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली.
शासन तातडीने मदत करणार- खासदार प्रफुल पटेल
राज्यातील जवळपास ३२ जिल्ह्यांत पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर शासन तातडीने मदत करणार आहे. शेतकर्यांना न्याय देण्यासाठी शासनाकडून २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला आहे. शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी आचारसंहिता पाळावी – राधाकृष्ण विखे पाटील
नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठकीत काजू बदामावर ताव मारणारा व्हिडिओ समोर आला. त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सरकार गंभीर आहे,मराठवाडा मुक्ती संगमाच्या दिवशी स्वत: मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे बैठकीत काय घडले यावर फोकस करण्यापेक्षा आता शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे.अशा बैठकीच्या वेळी अधिकाऱ्यांनी आचार संहिता पाळली पाहिजे. दुष्काळी बैठकीत काजू-बदाम खाताना चे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.



