भारत कोणत्याही देशाच्या दबावाखाली काम करत नाही, अमेरिकेच्या निर्बंध विधेयकावर सरकारचे स्पष्ट विधान

नवी दिल्ली: परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी पाश्चात्य देशांकडून रशियावर लादण्यात येत असलेल्या निर्बंधांच्या आणि भारतावर होणाऱ्या त्याच्या संभाव्य परिणामांच्या मुद्द्यावर ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे.
भारत कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता आपले स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवत राहील. देशातील जनतेचे कल्याण याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, की भारतीय जनता हे आमच्या सरकारचे प्रथम प्राधान्य आहे. आम्ही आपल्या देशाची आणि नागरिकांची आर्थिक शक्ती व स्थिरता सुनिश्चित सर्व आवश्यक पावले उचलू. भारत स्वतंत्र परराष्ट्र धोरण अवलंबतो. आम्ही दुसऱ्या देशाच्या सांगण्यावरून कोणत्याही गटात सामील होत नाही, तर केवळ आमच्या राष्ट्रीय हितासाठीच कार्य करतो.
परदेशी देशांकडून लादण्यात येत असलेल्या आयात शुल्कावर भारताची भूमिका मांडताना ते म्हणाले की, लादण्यात येत असलेले हे अन्यायकारक शुल्क पूर्णपणे चुकीचे आहे. भारत कोणाच्याही दबावाखाली कोणताही निर्णय घेणार नाही.
देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजांवर चर्चा करताना, कीर्ती वर्धन सिंह यांनी स्पष्ट केले की ऊर्जा सुरक्षा हा भारतासाठी एक प्रमुख चिंतेचा विषय आहे. सरकार आपल्या नागरिकांना अखंडित आणि परवडणारे इंधन पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे.



