Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

गोगावलेंच्या विधानानं खळबळ! पालकमंत्रीपदाचं श्रेय दिलं तटकरेंना; रायगडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

रायगडचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये अनेक काळापासून राजकीय शत्रुत्व आहे. अनेकदा विविध निवडणुकांमध्ये ते एकमेकांसमोर कट्टर विरोधक म्हणून उभे राहिले आहेत.

पण सध्या राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये हे दोघेही एकत्र आहेत.

राजकीय अपरिहार्यतेमुळं त्यांना एकत्र काम करावं लागतं आहे. पण अशातच आता आपल्याला मिळालेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदाचं श्रेय तटकरेंना दिलं आहे. त्यांच्या या जाहीर विधानामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळं आता रायगडच्या राजकारणात वेगळेच वारे वाहू लागले असल्याचं चित्र आहे.

नेमकं काय घडलं?

रायगडमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भरत गोगावले म्हणाले की, “रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे काही मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून संधी मिळाली. त्यामध्ये सिंहाचा वाटा हा अनिकेत तटकरेंचा आहे. त्यांना आम्ही बिनविरोध निवडून दिल्यामुळं त्यांनी आम्हाला पालकमंत्रीपद बिनविरोध केलं”

शिंदेसेनेत वादाची ठिणगी पडणार?

गोगवलेंनी अशा प्रकारे तटकरेंना जाहीररित्या श्रेय दिल्यानं आयुष्यभर तटकरेंविरोधात राजकारण करणारे रायगड जिल्ह्यातील शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळं रायगड शिवसेनेत वादाची ठिणगी पडू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

असं बदललं रायगडचं राजकारण

दरम्यान, अनिकेत तटकरे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र आहेत. तटकरे कुटुंब रायगड जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या प्रभावशाली कुटुंब आहे. त्यांचे काका अनिल तटकरे यापूर्वी याच मतदारसंघातून MLC होते. अनिकेत तटकरे मे २०१८ मध्ये रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांना ४२१ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे यांना २२१ मते मिळाली होती. त्यांचा कार्यकाळ १ जून २०१८ ते ३१ मे २०२४ पर्यंत होता.

त्यानंतर दुसऱ्यांदा अनिकेत तटकरे जून २०२६ मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले. कारण २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते अजित पवारांसोबत राहिले आणि हा पक्ष सध्या महायुतीत आहे. आघाडीचा धर्म म्हणून राजकीय तडजोड म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय वैर असलं तरी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरेंचा विजय निश्चित झाला. २२ जून २०२६ पासून त्यांनी पुन्हा विधानपरिषद आमदार म्हणून शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *