प्रसाद ओक म्हणजे धर्मवीर”; ६२ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून कौतुक वर्षाव

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील दिग्गज कलावंतांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक दिग्गजांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने, तर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांच्या वतीने त्यांच्या पत्नी हेलन यांनी राज कपूर जीवनगौरव तर अभिनेत्री राणी मुखर्जीने विशेष योगदान पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता प्रसाद ओक याचे विशेष कौतुक केले. प्रसाद ओक हा कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन असून त्याने दिग्दर्शक, अभिनेता आणि परीक्षक म्हणून उत्तम काम केले आहे, असे ते म्हणाले. ‘धर्मवीर’ चित्रपटातील प्रसादच्या कामाचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले, “जसे विष्णुपंत पागनीस म्हणजे संत तुकाराम आणि निळू फुले म्हणजे इरसाल राजकारणी, तसेच आता प्रसाद ओक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे हे समीकरण तयार झाले आहे. ज्यांनी आनंद दिघेंना पाहिले नाही, त्यांच्यासाठी प्रसादने साकारलेली भूमिकाच आयुष्यभर स्मरणात राहील.” मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांनंतर प्रसाद ओकने अत्यंत आदराने हात जोडून त्यांचे आभार मानले.
मराठी चित्रपटांच्या प्रगतीवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी सिनेमाची खरी ताकद आहे. ‘देऊळ बंद’सारखे चित्रपट आज १०० कोटींचे विक्रम रचत आहेत, ही संपूर्ण मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मराठी चित्रपटांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त चित्रनगरी विकसित करण्याचा आणि अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा आराखडा राज्य शासन लवकरच जाहीर करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.



