
बीड, 10 सप्टेंबर । पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परळी नगरपरिषदेच्या वतीने ना.पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रतिबंधात्मक अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
जिजामाता उद्यान येथे या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी स्वच्छता विभागातील स्थायी व अस्थायी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून शहरातील स्वच्छता तसेच आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून तेथे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
डेंग्यू-मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथके घराघरांत जाऊन पाण्याच्या टाक्या, साचलेले पाणी तसेच डासांची उत्पत्ती होऊ शकणाऱ्या ठिकाणांची पाहणी करणार आहेत.
परळी शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनीही आपल्या घराभोवती पाणी साचणार नाही याची दक्षता घेत या अभियानाला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.
बदलत्या हवामानातून होणाऱ्या ‘व्हायरल’ चा प्रतिबंध
——————-
सध्या आवर्षण परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाऐवजी कडक ऊन आणि बदलते हवामान जाणवत आहे. वातावरणातील या सततच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, विविध विषाणूजन्य आजारांसह डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत आहे.



