संजू सॅमसनने पुन्हा जिंकली सर्वांची मनं! १,००० विद्यार्थ्यांना मोफत IAS-IPS बनवण्यासाठी केली मोठी घोषणा

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने देशातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एका मोठ्या शैक्षणिक उपक्रमाची घोषणा केली आहे.
देशभरातील १,००० विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी ही विशेष शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ‘लीड इंडिया समिट’ दरम्यान संजू सॅमसन फाउंडेशन आणि ‘लीड आयएएस अकॅडमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आला. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्याचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न भंगू नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
व्यक्तिमत्त्व विकासासह वैयक्तिक मार्गदर्शन; संजूच्या गावाला मिळणार प्राधान्य!
या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी अभ्यासच नाही, तर वैयक्तिक मार्गदर्शन (मेंटॉरशिप) आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल. यात संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, विश्लेषणात्मक विचार आणि नेतृत्वगुण यांसारख्या कौशल्यांवर भर देण्यात येईल. विशेष म्हणजे संजूचे मूळ गाव असलेल्या विळिंजम (Vizhinjam) आणि लगतच्या किनारपट्टी भागातील विद्यार्थ्यांना या मोहिमेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. स्वतःच्या क्रिकेट प्रवासाचा दाखला देत संजूने सांगितले की, शिस्त, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे कोणतेही मोठे ध्येय गाठता येते.
माजी IPS-IAS अधिकाऱ्यांचे थेट मार्गदर्शन; दर्जेदार प्रशिक्षणाची हमी!
या उपक्रमासाठी भागीदार असलेल्या ‘लीड आयएएस अकॅडमी’ला देशातील अनेक वरिष्ठ आणि माजी सनदी अधिकाऱ्यांचे थेट मार्गदर्शन लाभत आहे. यामध्ये केरळचे माजी पोलीस महासंचालक ऋषिराज सिंग (IPS), सीबीआयचे माजी सहसंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण (IPS), माजी केंद्रीय शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप (IAS) आणि भारताचे माजी राजदूत टी. पी. श्रीनिवासन (IFS) या दिग्गजांचा समावेश आहे. या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळणार आहे.
शालेय वयापासूनच स्पर्धा परीक्षेची पायाभरणी; १ हजार विद्यार्थ्यांची निवड!
हा उपक्रम ‘लीड आयएएस ज्युनियर’ या शालेय स्तरावरील प्रतिभावान कार्यक्रमाशीही जोडला गेला आहे. यातून विद्यार्थ्यांना अगदी लहान वयातच चालू घडामोडी, वक्तृत्व, विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता आणि नैतिक मूल्यांची गोडी लावली जाईल, ज्यामुळे स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम होईल. या १,००० शिष्यवृत्तींच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांतील गुणवंत तरुण-तरुणींना देशाची सेवा करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.



