मुंबई

आठ दिवसात काँग्रेसची भाकरी फिरणार… नाना पटोले यांची उचलबांगडी? अशोक चव्हाणांचा दोन दिवसांपासून दिल्लीत तळ


मुंबई: कर्नाटक निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातल्या नेतृत्वातही बदल करावेत, महाराष्ट्र काँग्रेसमधील भाकरी फिरवावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी होणार असून त्या ठिकाणी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र दिल्लीतून अशोक चव्हाण यांच्या नावाला अद्याप कुठलाही ग्रीन सिग्नल नाही. तर दुसरीकडे नाना पटोले यांच्यासोबत काम करता येणार नाही असा सूर राज्यातील अनेक नेत्यांचा आहे. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर टीक करत अनेक नेत्यांनी या आधी नाराजी व्यक्त केली आहे, तसं पत्रही याआधी हायकमांडला पाठवण्यात आलं आहे.

प्रदेशाध्यक्षासोबत मुंबई काँग्रेस अध्यक्षही बदलणार….

पुढील दोन दिवसात काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशातून भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी अशोक चव्हाण यांच्या नावाला राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांची पसंती असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदासोबत मुंबई अध्यक्ष, गटनेता आणि महाराष्ट्र प्रभारी या चारही पदांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदावरून हटवावं यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही घेतली भेट घेतली होती. या सर्व परिस्थितीत येत्या आठ दिवसात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष बदलला तर राज्यातील सर्व कार्यकारिणीही बदलावी लागणार आहे. राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांना एकत्र घेऊन चालणारा आणि महाविकास आघाडीशी योग्य समन्वय ठेवणाऱ्या नेत्यांवर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. या आधीही त्यांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे या आधीच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन नाना पटोले यांची बदली करण्यात येणार असल्याची चर्चा होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *