
हैदराबाद : तेलंगणातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भद्राचलममधील गोदावरी नदीचा हवाई दौरा केला. हवाई दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना ढगफुटीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात लाईव्ह हिंदुस्थानने वृत्त दिलंय.
खरं तर, ढगफुटी होणं हे नवीन नाही. पण यामागे षडयंत्र असल्याचं अनेक लोक सांगत आहेत, असं केसीआर म्हणाले होते. तसंच बाहेरच्या देशाकडून भारतात ढगफुटी घडवली जात आहे, असं त्यांनी सांगितलं. पण खरंच दुसरे देश एखाद्या देशात ढगफुटी घडवून आणू शकतात का, असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. तर, त्याचं उत्तर आहे हो. एखादा देश दुसऱ्या देशात कृत्रिम पाऊस पाडू शकतो. अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव राज्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेले असता भारतात ढगफुटीच्या घटनांमागे परकीय शक्तींचं षड्यंत्र असल्याचं म्हणाले. यापूर्वीही लेह-लडाख आणि उत्तराखंडमध्येही अशा घटना घडवून आणल्या गेल्या, असं ते म्हणाले.