Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

खासदार संजय राऊत यांच्या टीकेला अशोक चव्हाण यांच्याकडून जशास तसे उत्तर; म्हणाले, ‘त्यांची ही शेवटची तडफड’

भाजपचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी घेऊन नरेंद्र मोदी यांच्याकडे का गेले नाहीत? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला होता.

नांदेडमध्ये ‘तुमसे ना हो पायेगा’ या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जनआंदोलनात राऊत यांनी अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले होते.

यावर अशोक चव्हाण यांनी मुदखेड येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात पलटवार केला. नांदेडमध्ये येऊन आमच्यावर टीका करून गेलेले नेते यापुर्वी कधी नांदेडमध्ये आले होते का? प्रत्येक जिल्ह्यात जायचे, काही तरी बोलायचे आणि बातम्यांमध्ये झळकायचे एवढाच विरोधकांचा कार्यक्रम सुरू आहे. त्यांची ही शेवटची तडफड आहे, असा टोला अशोक चव्हाण यांनी संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लगावला. महाराष्ट्रात जशी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप देवाभाऊंची आहे, तशी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगून टाकले. नांदेडला येऊन गेलेले नेते फक्त निवडणुकीपुरते येणारे आहेत. निवडणुका संपल्यानंतर तुमच्याकडे अशोक चव्हाण, श्रीजया चव्हाणच येणार आहेत, असा चिमटाही अशोक चव्हाण यांनी काढला.

नांदेडमध्ये आले होते, ते यापुर्वी कधी दिसले होते का? नांदेडमध्ये झालेली कामे त्यांनी पाहिली आहेत का? जनतेची दुःख त्यांनी कधी जाणून घेतली आहेत का? असा प्रश्नही अशोक चव्हाण यांनी या निमित्ताने उपस्थित केला. खासदार संजय राऊत यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला होता.

राज्यातील महायुती सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. हे सरकार २०२९ पूर्वीच जाईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. अशोक चव्हाण दिल्लीत सत्ताधारी भाजपाचे खासदार आहेत. शिवाय महाराष्ट्राचे ते माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महाराष्ट्रात, मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी घेऊन ते का गेले नाहीत? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *