
अहिल्यानगर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट-ब परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच गैरप्रकाराचा लाभ घेऊन निवड झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित निवडी रद्द कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सीताराम काकडे व युवक उपजिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे, शरद पवार, नामदेव पवार, अर्चना गायकवाड, फारुख रंगरेज, समीर पठाण, रामदास ससे, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील आहेत. आई-वडिलांच्या कष्टाच्या पैशातून वर्षानुवर्षे अभ्यास करून ते अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, पैसे देऊन प्रश्नपत्रिका मिळवून गैरप्रकाराचा फायदा घेता येत असेल, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत का करावी, असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण, निराशा आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. यापूर्वीही स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परीक्षेतील गैरप्रकारामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाऊ नये, ही शासनाची जबाबदारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रकाश पोटे, युवक उपजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष)विद्यार्थ्यांना उपकार नकोत, न्याय हवा आहे. अधिकारी होण्याचा मार्ग पैशाचा नव्हे, तर ज्ञान, गुणवत्ता आणि प्रामाणिक मेहनतीचा असला पाहिजे. पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी, त्यामागील आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची भूमिका यांचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी.



