
महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायण गड येथे आषाढी एकादशी निमित्त रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
पंचक्रोशीतील विविध गावांमधून वारकरी भाविक आषाढी वारी निमित्त विठुनामाचा जयघोष करत टाळ- मृदुंगाच्या गजरात दिंडीच्या माध्यमातून पायी चालत गडावर दाखल झाले होते. जिल्ह्यासह विविध भागातून श्री क्षेत्र नारायणगड येथे भाविकांची मांदियाळी होती. यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते पहाटे महापूजेसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दरम्यान विठूरायाच्या नामस्मरणाने व नगदनारायण महाराजांच्या जयघोषाने गडाचा परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
मराठवाडा ही साधू संतांची भूमी आहे याच मराठवाड्यामध्ये अनेक साधू संत जन्माला आले. भागवत धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भगवंत सेवेसाठी समर्पित केलेले आहे. याच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सोळाव्या शतकात स्वानंद सुखनिवासी सचिदानंद स्वरूप संत महात्मा नारायण महाराज यांनी स्थापन केलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडानी महाराष्ट्राची धाकटी पंढरी अशी आपली ओळख निर्माण झाली आहे. आषाढीवारी निमित्त जे भाविक भक्त श्री क्षेत्र पंढरपूर ला जाऊ शकत नाहीत ते धाकटी पंढरी म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड येथे येऊन विठ्ठल रुक्मिणी व नगदनारायण महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतात.