
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्याबाबत मोठा दावा केला आहे. खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या मेळाव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी संजय जाधवांना हा मेळावा रद्द करण्याचा इशारा दिला होता. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बोलताना जरांगे यांनी आपल्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा मेळावाच रद्द केला होता, असा दावा केला.
“जरांगे पाटलांनी सूट दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं अन्…”
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी दौरा रद्द केल्याचा मेसेज सुरुवातीला आला होता. मात्र, त्यानंतर काही मिनिटांनी पुन्हा एका अधिकाऱ्यांकडून कार्यक्रम घेण्यास अडचण नसल्याचा संदेश देण्यात आला. जरांगे पाटलांनी सूट दिलीये, असं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं. हा संदेश परभणी, हिंगोली, नांदेड किंवा लातूर येथील अधिकाऱ्यांपैकी कोणाकडून आला, याबाबत जरांगे यांनी नाव घेण्यास नकार दिला. मात्र, सुरुवातीला दौरा रद्द करण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला.
‘मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे शिंदेंना उतरती कळा’
यावेळी जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सभांबाबतही भाष्य केले. पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या लाखोंच्या सभा होत होत्या, असा उल्लेख करत आता सभांना पाच हजारांपर्यंत लोक येत असल्याचे ते म्हणाले. मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे शिंदे यांची उतरती कळा लागली असल्याचा दावा जरांगे यांनी केला. तसेच, आपल्या आधी परभणीत मोठी गर्दी दिसली नसती, असा दावाही त्यांनी केला.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मला सभेची आधी माहिती मिळाली असती तर तिथे 5-10 मराठे दिसले असते. सकाळी 11 वाजता मला या सभेची माहिती मिळाली. मला आधी समजलं असतं तर परभणी ते नांदेडपर्यंत शिंदे साहेबांना पळायला देखील जागा राहिली नसती. हे आधी देखील आम्ही करुन दाखवलेलं आहे. नांदेडचे मराठे तर विमानतळाचे दरवाजे तोडून आतमध्ये घुसलेले दिसले असते. पण ते आमचं जुळून येत नव्हतं. परभणीपर्यंत जायला वेळ लागला असता. ते हेलिकॉप्टरने फिरतात.. मग शिकार हाती लागली नसती.



