सरकारचे शिष्टमंडळ अद्याप आले नाही, पण जिल्हाधिकारी मध्यरात्री पोहोचल्या; जरांगे यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे मागील चार दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अद्याप राज्य सरकारचे कोणतेही शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी दाखल झालेले नसताना सोमवारी (ता.
३१) मध्यरात्री जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अंतरवाली सराटी येथे भेट देत जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी मित्तल अंतरवाली सराटी येथे पोहोचल्या. त्यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर होणाऱ्या परिणामांबाबतही माहिती घेतली.
दरम्यान, जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाशी चर्चा करून जरांगे यांच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली. उपोषणाच्या कालावधीत त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून मराठा समाजाचा प्रतिसाद मिळत आहे. अंतरवाली सराटी येथे समर्थकांची गर्दी वाढत असून, सरकारने तातडीने चर्चा करून मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, उपोषणाला चार दिवस उलटूनही सरकारकडून अद्याप अधिकृत शिष्टमंडळ चर्चेसाठी आलेले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यरात्रीच्या भेटीमुळे प्रशासनाकडून जरांगे यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सरकारकडून चर्चेसाठी शिष्टमंडळ कधी दाखल होते आणि मराठा आरक्षणाच्या मागणीवर काय भूमिका घेतली जाते, याकडे आता आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.



