
भा रताने अमेरिकेच्या एफ्-३५ लढाऊ विमानाला नाकारून रशियाचे एस्. यू-५७ लढाऊ विमान खरेदी करण्याची निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. भारताने रशियासमवेत ही विमाने घेण्याविषयी करार केल्यानंतर सर्व जगाला धक्का बसला आहे.
या निर्णयामुळे सर्वाधिक धक्का अमेरिकेला बसला आहे; कारण अमेरिका तिची एफ्-३५ विमाने भारताला विकण्यासाठी आग्रही होती. यातून भारताने जगाला दाखवून दिले आहे की, भारत कोणताही निर्णय कोणत्याही देशाच्या दबावाखाली न घेता केवळ स्वावलंबन आणि स्वाभिमान यांच्या आधारावर घेत आहे. रशियाच्या एस्.यू-५७ खरेदी करण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर अमेरिकेने त्वरित एफ्-३५ लढाऊ विमानांच्या विक्रीसाठी वाटाघाटी करणार्या ‘लॉकहीड मार्टिन’ आस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला; मात्र भारताने ‘सध्या आमच्याकडे वेळ नाही’, असे स्पष्ट करून त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. यापूर्वी भारताने अमेरिकेसमवेत असे कधीही केले नव्हते; मात्र आता भारताने अमेरिकेच्या द्वेषरूपी कृत्याला थारा न देण्याचा एकप्रकारे संकेतच यातून दिला आहे. अमेरिका भारताविषयी कितीही चांगले मत मांडत असली, तरी तिची भारतासमवेत युद्धनीती वेगळी आहे. एकीकडे भारताचा शत्रू पाकिस्तानला एफ्-१६ सारखी लढाऊ विमाने आणि इतर शस्त्रे देऊन भारताच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला साहाय्य करायचे अन् दुसरीकडे भारताकडून अधिक व्यापारी आणि शस्त्रास्त्रे, विमाने विकण्याविषयी वाटाघाटी करायच्या, हे अमेरिकेचे धोरण आहे. भारताने ‘आम्हाला आमच्या गरजा ठाऊक आहेत आणि आम्ही कोणत्याही परकीय दबावाखाली कोणताही करार करणार नाही’, हे अप्रत्यक्षपणे अमेरिकेसारख्या अहंभावी देशाला दाखवून दिले आहे. अमेरिकेच्या विरोधात भारताने घेतलेल्या भूमिकेची जगभर चर्चा आहे.
रशियाशी करार झाल्यास त्याच्या पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर एस्-५७ भारतीय हवाई दलाचे बलस्थान बनणार आहे. भारत अशी एकूण २४ विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे. हे लढाऊ विमान शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा देते, तसेच त्यात आधुनिक एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) आधारित प्रणाली, सुपरक्रूझ क्षमता आणि बहुलक्ष्य आक्रमण करण्याची क्षमता ही त्याची वैशिष्ट्येही आहेत. या लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान रशियाने अत्यंत गुप्त ठेवले होते. आता भारत त्याचा पहिला मोठा आंतरराष्ट्रीय खरेदीदार बनण्याच्या सिद्धतेत आहे. यांसह भारत रशियाकडून ‘एस्-५०० डिफेन्स सिस्टीम’ही खरेदी करणार आहे. रशियाने आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले हे उपकरण केवळ भारताकडेच असेल. रशियाने हे उपकरण भारत सोडून अन्य कोणत्याही देशाला न विकण्याचा निर्णय घेतला आहे. भारत हा चांगला मित्र असल्याने रशियाने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी अमेरिकेची एफ्-३५ घेण्याविषयी चर्चा चालू झाली, तेव्हा भारताने अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्या होत्या. ‘ही विमाने भारतात बनवली जावीत, तसेच अमेरिकेत ज्या किमतीत ही विमाने विकली जातात, त्याच किमतीत भारतालाही ही विमाने आणि त्याचे तंत्रज्ञान सुपुर्द करावे’, अशा या काही अटी होत्या; मात्र या अटी अमेरिकेला झोंबल्या. त्यामुळे अनेक दिवसांपासून या विमानांच्या खरेदीवर चर्चा पुढे सरकत नव्हती. अंततः भारताने रशियावर विश्वास ठेवून एस्-५७ ही लढाऊ विमाने खरेदी करण्याचे धोरण निश्चित केले. ही लढाऊ विमाने अमेरिकेच्या एफ्-३५ पेक्षा कितीतरी सरस आणि तंत्रज्ञानाने प्रगत आहेत. भारत कुणावरही अवलंबून नाही. कोणताही करार त्याच्या स्वतःच्या अटींवर केला जातो. जर अमेरिका तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करत नसेल, तर भारत तिची लढाऊ विमाने अर्ध्या किमतीतही खरेदी करणार नाही, असा बाणेदारपणा भारताने दाखवून दिला आहे आणि हीच युद्धनीती आहे.
चीनला शह देण्याच्या हेतूने एफ्-३५ विमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला देऊ केले असले, तरीही ते प्रचंड महाग आहे. त्याच्या तुलनेत स्वस्त असणार्या रशियन विमानांचा पर्याय भारतासमोर होता. एफ्-३५ विमानांचे अनेकदा अपघात झाले आहेत आणि या विमानांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही विमाने वापरण्यासाठीचा खर्च अवाढव्य आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. लढाऊ विमानांची खरेदी असो वा व्यापारी धोरण यांमध्ये आजपर्यंतचा इतिहास पहाता अमेरिकेने भारतासमवेत दुजाभाव केला आहे, तसेच अमेरिका डावपेच खेळून भारताला कायम कोंडीत पकडणे अथवा भारताला शह देण्याचा प्रयत्न करत असते.
भारत वर्ष १९९० च्या दशकापासून आतंकवादाची झळ सोसत आहे. भारताने सहस्रो निष्पाप नागरिक यामध्ये गमावले आहेत. अमेरिकेत वर्ष २००१ मध्ये ९/११ आक्रमण झाले. त्यानंतर अमेरिकेने संयम बाळगला होता का ? इराणचा उच्च सैन्य अधिकारी कासिम सुलेमानीला ड्रोन आक्रमणात ठार मारतांना विचार केला होता का? अमेरिकी जनतेचा जीव जेव्हा धोक्यात येतो, तेव्हा अमेरिकेने कधी संयम दाखवलाय का ? भारतावर मात्र आतंकवादी आक्रमण झाल्यावर अमेरिका भारताला संयम बाळगण्याचा सल्ला देते. त्यामुळे अमेरिकेचे भारताने का ऐकावे? संपूर्ण जग आतंकवादाच्या सावटाखाली आहे, याची माहिती अमेरिकेला आहे. पाकिस्तान त्यामागचा प्रायोजक आहे, हेही तिला ठाऊक आहे. तरीही अमेरिकेने पाकिस्तानला एफ्-१६ लढाऊ विमाने का दिली ? याच विमानांचा वापर पाकिस्तानने वर्ष २०१९ मध्ये भारताच्या विरोधात केला होता. मुळात अमेरिकेला कुणाशी काही देणघेणे नाही. ती नेहमीच स्वतःचा लाभ आणि हित पहाते. तिला भारत-पाकिस्तान दोन्ही देशांना खेळवायचे आहे. अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानमधून बाहेर पडले आहे. यासाठी पाकिस्तानचे महत्त्व तसे अल्प झाले आहे. तरीही अमेरिकेला भारताच्या विरोधात पाकिस्तानची आवश्यकता आहे आणि चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारताची आवश्यकता आहे. त्यामुळे भारताने स्वार्थी अमेिरकेचे डावपेच ओळखून त्याला त्यांच्या भाषेत धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. असे केल्यानंतरच अमेरिका वठणीवर येऊ शकेल. भारत मुत्सद्देगिरी वापरून योग्य ती पावले उचलत आहे, हे चांगलेच आहे; मात्र त्यासह आर्थिक आणि सामरिक दृष्ट्या सुसज्ज होणे, हे भारतासाठी येणार्या काळात आव्हान असेल. एकदा का भारत सर्वांगाने सुसज्ज झाला, मग त्याला अमेरिका किंवा रशिया कुणावरही अवलंबून रहाण्याची आवश्यकता भासणार नाही. तो दिवस लवकरात लवकर येण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !