ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

पुणे जिल्हा : “मोठी कर्जे देऊ नका” ; बॅंक, पतसंस्थांना सहकारमंत्री वळसे यांचे आवाहन


मंचर – बॅंका आणि पतसंस्थांनी पारदर्शक कारभार करून सभासदाचा विश्‍वास संपादन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवीन नवीन कायदे त्यातील सुधारणा याचा अधिक अभ्यास करून शिकले पाहिजे. संगणक प्रणालीचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. बॅंकानी पतसंस्थेच्या ठेवी कमी करून सभासद ग्राहकांच्या ठेवी स्वीकारण्यास प्राधान्य देऊन त्यातून फायदा होईल, मोठीमोठी कर्ज देऊ नका, अशी सूचना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

मंचर (ता. आंबेगाव) येथील शरद सहकारी बॅंकेची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवगिरी मंगल कार्यालयात पार पडली. त्यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी बॅंकेचे अध्यक्ष उद्योजक देवेंद्र शहा हे होते. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, युवानेत्या पूर्वा वळसे पाटील, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, सभापती वसंत भालेराव, कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे, विष्णूकाका हिंगे, सुभाष मोरमारे, अजय घुले यांच्यासह सभासद उपस्थित होते.

यावेळी झालेल्या भीमाशंकरचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, किसनराव उंडे, बाबाजी टेमगिरे, बाळासाहेब बाणखेले, भगवान ढेरंगे, रमेश खिल्लारी, सोपान शिंदे, जे. एल. वाबळे, राजू इनामदार, गुलाब नेहरकर, दादाभाऊ पोखरकर यांनी सहभाग घेतला.

वळसे पाटील म्हणाले की, ज्याने कर्ज घेतले तो दर महिन्याला कर्जाचा हप्ता कसा भरणार याची पूर्ण माहिती झाल्याशिवाय कर्ज देऊ नका. त्याची आर्थिक स्थिती तपासून पहा.

सहकार कायद्यात नवीन नवीन बदल होणार आहे. त्याच्या परिणामकारक अंमलबजावणीत महाराष्ट्राचा मोठा वाटा व पुढाकार असणार आहे. संचालक पांडुरंग पवार, व्यवस्थापिकिय संचालक राजेंद्र देशमुख, सुनील दनाईत यांची भाषणे झाली . अहवाल वाचन बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना काकडे यांनी, सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी तर माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे यांनी आभार मानले.

शरद बॅंकेत पैसा सुरक्षित
शरद सहकारी बॅंकेने 50 वर्षात प्रगतीची घोडदौड केली आहे.संस्थांना कुठेही गालबोट लागून बदनामी होणार नाही याची काळजी सभासदांनी घ्यावी. शरद बॅंकेत आपला पैसा सुरक्षित आहे, अशी ग्वाही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारच्या स्टार्ट अप धोरणानुसार लहान कर्जदार यांना व्यवसायासाठी प्राधान्याने कर्ज देण्याचा प्रयत्न केला जातोय. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ज्या विश्‍वासाने जबाबदारी दिली त्यांच्या विश्‍वासाला जरूर पात्र ठरेल अशी ग्वाही त्यांनी दिली. शरद बॅंकेची घोडदौड होताना संस्थापक माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांचे विचार पुढे नेले जात आहे. 2027 पर्यंत बॅंकेच्या ठेवी 1500 कोटींवरून 5 हजार कोटीपर्यंत नेण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. – देवेंद्र शहा, अध्यक्ष, शरद सहकारी बॅंक


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *