क्राईम

विवाहित महिला प्रेमात आंधळी, ना घर बघितलं ना परिवार,तिच्या दोन मुलांची हत्या


रायगड : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात मंगळवारी (9 एप्रिल) 25 वर्षांच्या एका महिलेला कथितरीत्या तिच्या दोन मुलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पोलिसांनी मंगळवारी अशी माहिती दिली, की आरोपी महिलेला आपल्या प्रियकरासोबत राहायचं होतं.

त्यामुळे मुलांपासून सुटका मिळवण्यासाठी तिने त्यांची हत्या केली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शीतल पोले नावाच्या महिलेने 31 मार्च रोजी आपली पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा यांची कथितरीत्या हत्या केली.

त्या अधिकाऱ्याने सांगितलं, की आरोपी महिलेला आपल्या पतीला सोडून द्यायचं होतं आणि तिचं ज्याच्यावर प्रेम होतं, त्या व्यक्तीसोबत तिला राहायचं होतं. तिला असं वाटत होतं, की आपली मुलं हा त्यामध्ये अडथळा आहे. त्यामुळे शीतलने 31 मार्च रोजी सायंकाळी आपल्या मुलांचा गळा आवळला. ही घटना घडली, तेव्हा महिलेचा पती घरी नव्हता. पती घरी आला, तेव्हा पत्नीने त्याला सांगितलं, की मुलं झोपली आहेत; मात्र मुलं बेशुद्ध असल्याचं लक्षात येताच पतीने त्यांना अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे त्या दोघांनाही मृत घोषित करण्यात आलं.

चौकशीच्या वेळी पोलिसांच्या असं लक्षात आलं, की शीतल विसंगत माहिती देत आहे. अखेर कसून चौकशी केल्यावर तिने आपला गुन्हा कबूल केला. अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली, की ज्या व्यक्तीशी तिचे कथितरीत्या अनैतिक संबंध होते, त्याचीदेखील चौकशी करण्यात आली.

आरोपी महिलेला कोर्टाने मंगळवारी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलं. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आईनेच आपल्या मुलांचा गळा घोटल्याच्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राबाहेर अशा अनेक घटना घडत असल्याच्या बातम्या येत असतात; मात्र महाराष्ट्रात त्याचं प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळेच या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *